लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात उमेदच्या “कवडीच्या राखीचा” बोलबाला
दिनांक – १४ सप्टेंबर २०२४ रोजी परंडा येथील कोटला मैदानात “लाडकी बहीण” योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.यावेळी धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.तानाजीराव सावंत, मा.आ.ज्ञानराज चौगुले, मा.आ.सुजितसिंग ठाकूर, धाराशिव जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक मा.संजय जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मा.प्रांजल शिंदे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील समुदाय संसाधन व्यक्ती आणि स्वयंसहाय्यता समुहातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या, मुख्यमंत्र्यांचा प्रवेश कार्यक्रमस्थळी झाल्यानंतर नवचैतन्य पसरल्याचे चित्र दिसुन येत होते, मुख्य स्टेजच्या मधोमध असलेला लाल रंगाचा गालीचा आणि दोन्ही बाजूंनी घोषणा देत, मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत हातात कवडीच्या राख्या घेऊन उभ्या असलेल्या उमेद अभियानातील महिला सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. मुख्यमंत्री जसजसे स्टेजच्या जवळ जात होते तसतसा मुख्यमंत्र्याच्या हात “कवडीच्या राखीने” भरून जात होता. महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपिठांपैकी प्रमुख पीठ म्हणून श्री क्षेत्र तुळजापूर हे सर्वत्र प्रसिद्ध आहे, या तीर्थक्षेत्राची ओळख आणि मांगल्याचं प्रतिक म्हणून तुळजाभवानी देवीच्या “कवडीला” विशेष महत्व आहे. जगभरातील नवतरुणाईलादेखील या तुळजाभवानीच्या कवडीने भूरळ घातली आहे, कवडीचा वापर वेगवेगळे अलंकार, आभूषणे इ.मध्येदेखील सर्वत्र केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यानुषंगानेच उमेद अभियानातील महिलांना सन २०२३-२४ या वर्षामध्ये कवडीची राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, या प्रशिक्षणानंतर महिलांनी तयार केलेल्या ३० हजार राख्यांची विक्रीदेखील करण्यात आली होती, आणि आता लाकडी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे निमित्ताने कवडीच्या राखीने मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत मजल मारली आहे. कार्यक्रमस्थळी मुख्य स्टेजवर बंजारा समाजातील महिला सिंधु पवार आणि पुष्पा पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना कवडीची राखी बांधण्यात आली, “ज्या भावाने आम्हा सर्व बहीणींना रक्षा बंधनाची ओवाळणी दिली, त्या भावाच्या हातात तुळजाभवानीचा आशीर्वाद म्हणून कवडीची राखी बांधून समाधान वाटल्याचे उमरगा तालुकयातील बंजारा भगिनी सिंधू पवार यांनी सांगितले.