धाराशिव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करा
धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करा, धाराशिव जिल्ह्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय करा आणि उच्च शिक्षणाची संधी धाराशिव सारख्या मागास जिल्ह्यात विद्यापीठाच्या माध्यमातून जिल्हावासियांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य श्री देविदास पाठक आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे कि,धाराशिव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे उपकेंद्र मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या विद्यापीठात एकूण 11 विभागात पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. या विद्यापीठ उपकेंद्रात 60 एकर जागा असून विद्यापीठाच्या उप परिसरात मुख्य इमारतीसह अन्य काही इमारती घेण्यास जागा उपलब्ध आहे. या विद्यापीठ उपकेंद्रात पायाभूत सुविधा इमारती तसेच अनुषंगिक गोष्टी उपलब्ध असून उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध आहेत.
धाराशिव जिल्हा हा केंद्र सरकारच्या नीती आयोगाने जाहीर केलेला आकांक्षीत जिल्हा असून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी उच्च शिक्षणाच्या संधी धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे.
यासाठी आपण धाराशिव जिल्ह्याला विशेष बाब म्हणून विद्यापीठ उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यास मान्यता द्यावी ही समस्त धाराशिवकरांची इच्छा आहे.कारण धाराशिव हा मराठवाड्यातील सर्वात शेवटचा जिल्हा असून येथून विद्यापीठात जाण्यासाठी विद्यार्थ्याला भरपूर वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो .त्याऐवजी धाराशिव येथेच स्वतंत्र जिल्हा विद्यापीठ मंजूर झाल्यास धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची आणि भावी पिढीची उच्च शिक्षणाची सोय दूर होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अनुसरून धाराशिव जिल्ह्यात असे उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करणे सोयीचे होईल,
धाराशिवकरांच्या उच्च शिक्षणाचा अनुशेष दूर करण्यासाठी आणि जिल्ह्याचे मागासलेपण घालवून जिल्हा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक आणि तंत्रज्ञानाची दारे खुले करण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.