
एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे रु. १३७ कोटी जमा
उर्वरित रु. ८९ कोटी साठी शेतकरी बांधवांनी तात्काळ ईकेवायसी पूर्ण करून घ्यावे : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्यात एप्रिल व मे २०२४ मध्ये अवेळी पाऊस तर सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून २२६.८७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यापैकी १ लाख ६ हजार ५८७ शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत १३७.७७ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.उर्वरित ८९.०९ कोटी रुपये शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर सादर केली नसल्यामुळे आणि ईकेवायसी पूर्ण न झाल्याने वितरित होणे बाकी आहे. त्यामुळे बाधित शेतकरी बांधवांनी तात्काळ ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि आपल्या हक्काची नुकसान भरपाई पदरात पाडून घ्यावी असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्या पोर्टलवर आतापर्यंत पात्र ठरलेल्या १ लाख ८३ हजार ६२३ शेतकऱ्यांपैकी १ लाख ५१ हजार ६५० शेतकऱ्यांची माहिती अपलोड झालेली आहे. अपलोड करण्यात आलेल्या माहितीपैकी आजअखेर १६ हजार ४६३ शेतकरी बांधवांचे ईकेवायसी होणे बाकी आहे. त्यामुळे उपलब्ध झालेल्या एकूण २२६ कोटी ८७ लाख रुपयांपैकी वितरण झालेले १३७.७७ कोटी रुपये वगळता आणखी ८९.०९ कोटी रुपये वितरित होणे बाकी आहे. पात्र असलेल्या आणि अद्याप पोर्टलवर माहिती न भरलेल्या तसेच ज्यांची ईकेवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी तातडीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
—
जिल्ह्यातील ५७ पैकी ३३ महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ महिन्यात अतिवृष्टी झाली होती. ज्याठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही तेथेही नदी-नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीसाठी राज्य आणि केंद्राच्या आपत्ती निवारण निधीचे निकष ठरलेले आहेत. मात्र अतिवृष्टी आणि सततचा पाऊस नसतानाही, ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे, तिथे तलाठ्यांमार्फत नुकसानीचे पंचनामे करून तसा स्वयंस्पष्ट अहवाल घेण्याच्या सूचना तहसीलदार तथा कृषी अधिकार्यांरना आपण दिल्या होत्या. पाडोळी शिवारात साधारणपणे दोन हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी नदीकाठी पुरामुळे ३५० हेक्टरहून अधिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. अतिवृष्टीमुळे जिथे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना ज्या पद्धतीने मदत केली जाते अगदी त्याप्रमाणेच पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांतनाही राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची मदत मिळवून देण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सूर आहे.