
परवाना कालबाह्य, तरी उत्खनन जोरात; प्रशासनाची भूमिका संशयास्पद
धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर लातूर महामार्गावर असणाऱ्या काक्रंबा उड्डाणपुलाच्या कामासाठी अवैध उत्खनन सुरू असल्याबाबत वृत्तमालिका सुरू असताना कंत्राटदाराची मुजोरी थांबताना दिसत नाही.या कामासाठी अवैध उत्खनन तर झालेच मात्र कारवाई टाळण्यासाठी मोजक्या परवानग्या मागच्या तारखेत परवानग्या घेतल्याचा संशय तर आहेच मात्र मागच्या तारखेत घेतलेल्या परवानगीची देखील तारीख संपलेली असताना पुन्हा उत्खनन सुरू असल्याने हे उत्खनन प्रशासनाच्या नाकावर टिच्चून केले जात आहे.
ज्या गटातून उत्खननाची परवानगी काढली आहे त्याशिवाय इतर ठिकाणांहूनही उत्खनन केले गेले आहे. मात्र आजतागायत या प्रकरणात तहसिलदार, जिल्हा खणीकर्म अधिकारी यांनी कोणतीच कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. जिल्हाधिकारी देखील या प्रकरणात शांत असल्याने नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय तर झालाच मात्र त्या मोबदल्यात जे स्वामित्वधन मिळणार होते त्यावर देखील पाणी सोडावे लागत असून शासनालाच प्रशासनातील अधिकारी करोडोंचा चुना लावत असल्याचे बोलले जात आहे. तलाठी ते जिल्हाधिकारी सगळेच या प्रकरणात असल्याने महसूल विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी निःपक्ष स्वतंत्र यंत्रणा उभी केल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे.