परदेशातील उद्योग जगताला आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरवण्यात महाराष्ट्र राहणार अग्रेसर
अल्पकालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी एक सक्षम यंत्रणा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई,दि.१० : आयटीआय मार्फत राबविण्यात येणारे अल्पकालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे राबवा.परदेशातील उद्योग जगताला आवश्यक कुशल मनुष्यबळ लक्षात घेवून त्याच धर्तीच्या अभ्यासक्रमांचाही प्रशिक्षणात समावेश करावा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बरोबरच खाजगी औद्योगिक प्रशिक्षणासाठी एक सक्षम यंत्रणा तयार करा. प्रशासनमार्फत केलेल्या सर्व सामंजस्य कराराचा आढावा सीएम डॅशबोर्डवर घेण्यात यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
सह्याद्री अतिथीगृह कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, आयुक्त लहूराज माळी, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यासह विभागाचे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परदेशात आज कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे हे लक्षात घेवून विभागाने काळानुरूप आवश्यक असे अभ्यासक्रम सुरू करावेत. रोजगार वाढीसाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी एक सक्षम यंत्रणा तयार करावी.एखाद्या व्यक्तीने कौशल्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून ते अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतची सर्व माहिती डिजिटली तपासली जावी. शासकीय आयटीआय जागतिक दर्जाच्या कौशल्य केंद्रात रूपांतरीत करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्या मित्राकडूनही मार्गदर्शन घेण्यात यावे अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जास्तीत जास्त उद्योजक तयार करणार : मंत्री मंगल प्रभात लोढा
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना तसेच उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.आयटीआय मध्ये सौर तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन मेकॅनिक, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग (3D प्रिंटिंग), ड्रोन तंत्रज्ञ, औद्योगिक रोबोटिक्स, AI प्रोग्रामिंग असिस्टंट असे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. शहरी, ग्रामीण व आदिवासी भागासाठी त्यांच्या गरजावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतील असेही मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले.
अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी विभागाची रचना,योजना व सद्यस्थितीची माहिती सादरीकरणातून दिली.विभागातील नाविन्यपूर्ण उपक्रम,यशोगाथा याची देखील सविस्तरपणे त्यांनी माहिती दिली.
यावेळी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीसोबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने विविध प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केला.महिन्द्रा ॲण्ड लिमीटेडचे हेड प्र फुल्ल पांडे,कौशल्य विकास, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा शिक्षण विभागाचे हेड डॉ लेविस यावेळी उपस्थित होते.
