
लोकसभा निवडणुकीतील राखीव कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता देण्यात यावा
धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) – जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया हजारो कर्मचाऱ्यांच्या मदतीने दि.७ मे रोजी सुनियोजितपणे पार पडली आहे. या निवडणुकीतील राखीव कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता देण्यात यावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.१६ मे रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रियेसाठी १० टक्के टक्के कर्मचारी हे राखीव कर्मचारी म्हणून घेतले जातात. या सर्व राखीव कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयापासून जवळपास १०० ते १५० किलोमीटर अंतरावरील विधानसभा मतदारसंघात जाऊन आपले निवडणूक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलेले आहे.
प्रत्यक्ष मतदान बुथवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाचे मानधन (भत्ता) देण्यात आला. परंतू राखीव कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाचे मानधन (भत्ता) देण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व राखीव कर्मचाऱ्यांना सुद्धा निवडणूक कामाचा भत्ता देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य बशीर तांबोळी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, चिटणीस महेबूब काझी, नगर परिषद विभाग जिल्हा प्रमुख राजेंद्र पवार, शाहू शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुरेश भालेराव, कळंब तालुकाध्यक्ष महेंद्र रणदिवे, जुनी पेन्शन आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन भांडे, धाराशिव तालुकाध्यक्ष नागनाथ मुडबे, शिवाजी साखरे, मिलिंद धावारे, लहू जगताप, प्रफुल्ल झाडबुके, सुनील आरेकर, बाळासाहेब कांबळे, रविराज राठोड, मनोज कुरे, श्रीहरी बिडवे, शिवाजी कोटलवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.