
समाज बांधवांच्या लढयाला यश, सरकारला सुचले उशिरा शहाणपण, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळया साठी जागा मंजूरीवर आमदार पाटील यांचे मत
धाराशिव : शहरातील शासकीय दुध डेअरी समोरील जागा हस्तातरण करण्यासाठी गेली अनेक वर्ष विविध संघटना संघर्ष करीत होत्या.याबाबत समाज बांधव यांना सोबत घेऊन सर्व पातळीवर पाठपुरावा केला. मात्र हे यश समाज बांधवांच्या लढ्याला आहे. शासनाला उशिरा सुचलेलं हे शहाणपण असल्याची प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
आ.पाटील म्हणाले,शासकीय दुध योजनेतील जमीन यंत्रसामुग्री जिल्हा / तालुका सहकारी दुध केंद्राकडे तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी तत्वावर हस्तांतरित करण्याचा धोरणात्मक निर्णय ११ नोव्हेंबर २००२ च्या शासन निर्णयांत घेण्यात आला होता. हे कारण देत सदरील प्रस्ताव फेटाळण्यात आला.
त्यानंतर अनेकवेळा समाज बांधवानी वेगवेगळ्या पातळीवर लढा दिला. शिवसेना नगरसेवक देवानंद येडके १७ ते २२ मे २०२३ असे सहा दिवस उपोषण केले. ३१ मे २०२३ रोजी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जागा हस्तांतरण करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याबाबत आपण स्वतः पत्राव्दारे मागणी केली. त्यानुषंगाने २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्री मोहदयांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते पण ही बैठक जाणीवपूर्वक रद्द करण्यात आली. आपण अधिवेशन काळात सभागृहात हा प्रश्न विचारून सरकारच लक्ष वेधले. शासन निर्णयानुसार चार जुन २०१६ अन्वये लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे छत्रपती संभाजीनगर येथे स्मारक उभारण्यास शासकीय दुध योजना, छत्रपती संभाजीनगर येथील जागा हस्तांतरीत करण्यात आली होती.त्या धर्तीवर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक उभारण्याकरीता धाराशिव शहरातील शासकीय दुध योजना डेअरी परिसरातील एक एकर जागा हस्तांतरीत करण्याबाबतचा पुर्नेप्रस्ताव देण्याचे जिल्हाधिकारी यांना आपण कळवलं होत.त्यानुसार २३ मे २०२३ रोजी पुर्नेप्रस्ताव सादर करण्यात आला व २६ जून २०२३ रोजी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्द्याधारे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे याचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुद्दा आपण मांडला.याबाबत सहा जानेवारी 2023 रोजी प्रधान सचिव कृषी, पशुसवर्धन यांच्याकडे परत मागणी केली. अशाप्रकारे सर्व पातळीवर समाज बांधव पाठपुरावा केल्याने अखेर सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याचे आमदार पाटील यांनी म्हटलं आहे. उशिरा का होईना सरकारला शहानपण सुचलं असा टोला लगावला आहे. हे यश समाजाच्या लढयाचे असून हाच निर्णय सरकारने वेळीच घेतला असता तर आतापर्यंत पुतळा उभारणीचे कामही पूर्ण झाले असते अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना पण सरकारने हा निर्णय घेतला त्याबद्दल समाज बांधवाचे पाटील यांनी अभिनंदन केले.