अक्षय तृतीयेच्या दिवशी संभावित बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
धाराशिव – राज्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 तसेच अधिनियम 2022 देखील लागू करण्यात आला आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अंतर्गत गावपातळी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामीण भागाकरिता अंगणवाडी सेविका व शहरी भागाकरिता पर्यवेक्षिका यांना घोषित करण्यात आले आहे.
बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार बालविवाह आयोजित करणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे.अक्षय तृतीया या दिवशी राज्यात मोठ्या प्रमाणात सामूहिकरित्या बालविवाह होतात.जिल्ह्यात बालविवाह होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात कळविले आहे. त्या अनुषंगाने 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संभावित बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभाग व बाल संरक्षण समिती यांना सोबत घेऊन बालविवाह रोखण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात बालविवाह होऊ नये याकरिता आवश्यक उपाययोजना व जनजागृती करण्यासाठी तसेच 1098 चाईल्ड हेल्पलाइन टोल फ्री क्रमांकावर माहिती देता येईल.अक्षय तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या शुभमुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात.त्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.अक्षय तृतीया दिवशी बालविवाह होणार असल्यास किंवा झाल्यास तात्काळ जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांना माहिती द्यावी.