२५ मंडळातील ३७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३९ कोटी रुपये वितरित!
-आ. राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी) – खरीप हंगाम २०२३ मध्ये सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानी पोटी जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी दाखल केल्या होत्या. यातील २५% पेक्षा कमी क्षेत्राच्या तक्रारी आलेल्या २५ मंडळातील ३७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. २५% पेक्षा जास्त क्षेत्राच्या तक्रारी आलेल्या उर्वरित ३२ मंडळातील शेतकऱ्यांबाबत नुकसानीची रक्कम ठरविण्याची कार्यप्रणाली अन्यायकारक असून ती बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विमा कंपनीकडे प्राप्त १ लाख ९२ हजार नुकसानीच्या पूर्व सूचनेतील २५% पेक्षा कमी क्षेत्राच्या तक्रारी असलेल्या २५ महसूल मंडळातील शेतकाऱ्यांना विमा देण्यात आला आहे. उर्वरित ३२ महसूल मंडळात शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र नुकसान भरपाईची रक्कम ठरवत असताना अवलंबली जात असलेली कार्यप्रणाली शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याने यामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या हंगामात पावसातील खंडामुळे झालेल्या नुकसानीपोटी २५% अग्रिम प्रमाणे यापूर्वीच शेतकऱ्यांना रु.२५२ कोटी वितरित करण्यात आले आहेत. तर ऑनलाईन तक्रार दिलेल्या जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकचे १०० कोटी रुपये जमा होणे अपेक्षित आहे. मात्र उर्वरित ३२ महसूल मंडळाबाबत त्याप्रमाणे कार्यवाही होत नसल्याने कार्यप्रणालीत दुरुस्ती करण्याचे सूचित करण्यात आले आहे. या बाबत पाठपुरावा सुरू असून लवकर पैसे मिळावे या साठी प्रयत्न सुरू आहेत.